गल्लीबोळातली परिस्थिती दाखवल्यानं माझ्यावर FIR, स्वतंत्र पत्रकार मुक्ता कदम यांच्याबाबत काय घडलं?

महाराष्ट्रात जानेवारीत महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्या काळात मुक्त पत्रकार मुक्ता कदम यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून FIR नोंदवण्यात आली.
मुक्ता कदम यांनी नांदेड शहरातील पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, शिक्षण समस्या या विषयांवर सोशल मीडियच्या माध्यमातून वृत्तांकन केले.
तसंच, निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी फेसबुकवर काही सोशल मीडिया पोस्ट केल्या. त्या पोस्टवर निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करणाऱ्या नोडल अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत मुक्ता कदम यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली.
ही तक्रार नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रशांत लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना अशी तक्रार नोंद झाल्याचं सांगितलं. तसंच, मुक्ता कदम यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.
“मुक्ता कदम यांच्याविषयीची तक्रार आम्ही सायबर विभागाकडे पाठवली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. येत्या काळात हा तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल केली जाईल आणि ती न्यायालयात मांडली जाईल,” असं लोंढे म्हणाले.
दरम्यान, ही तक्रार केवळ माझा आवाज दाबण्यासाठी आणि भीती दाखवण्यासाठी केली असल्याचं मुक्ता कदम यांनी म्हटलं आहे.
या विषयी मुक्ता कदम मनाल्या “मी कोणत्याही पक्षाची पदाधिकारी नाही किंवा कार्यकर्ती नाही. त्यामुळे मला वाटतं मी कोणतीही चूक केलेली नाही. मी नांदेड शहरातील नागरी समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या. नांदेडच्या गल्लीबोळातील परिस्थिती मी दाखवली. त्यामुळेच माझ्याविरोधात अशी तक्रार देण्यात आली असावी.”



